संताजी पालखी सोहळ्यास तेली समाजातील सर्वांचेच सहकार्य
श्री संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ : इतिहास (भाग 25 )
( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
संताजी पालखी सोहळ्यास तेली समाजातील सर्वांचेच सहकार्य

या व इतर सर्व मंडळींनी नावारूपास आणालेला हा पालखी सोहळा. त्या सोहळ्यास जर प्रथम आर्थिक सहकार्याचा हात कोणी दिला आसेल तर तो अर्जुनशेठ बरडकर या दानशूर महामानवाने. तो नसता तर श्री. राऊत, श्री. भगत, श्री. देशमाने यांची धडपडही प्रत्यक्षात येऊच शकली नसती. काही वर्षे श्री. पांडूरंग धोमकर यांनी बरेच प्रयत्न केले. पालखीत महाराजांचा मुखवटा घेऊन जात असत. ती पद्धत बंद करून श्रींच्या पादुका घेऊन जाऊ लागले. सन १९८४ मध्ये पुण्याचे श्री. अंबादास शिंदे व श्री. रमेशशेठ व्हावळ यांनी बरीच रक्कम आणून दिली. यात भर घालणे गरजेचे असल्याने श्री. सदाशिव पवार यांनी थोड्या काळात आपल्या मित्रमंडळींकडून देणग्या जमा करून महाराजांच्या चांदीच्या पादुका बनवून दिल्या. पादुका झाल्या, पण रथ झालेला नव्हता. ही उणीव कार्यकारी मंडळीनी भरून काढावयाचे ठरविले. सन १९८५ ची वारी एक महिन्यावर आली होती. त्या वेळी रथ बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी सर्व मंडळींनी प्रत्येकी २००० रू. प्रत्येकी ठेव म्हणुन जमा करून श्री. सदाशिव पवार यांनी उरलेली रक्कम भरून घरातील लोक व श्री. संजय शिंदे व इतरांचे सहकार्य घेऊन रात्रंदिवस राबून त्यांनी १ महिन्यात रथ तयार करून घेतला. तो ठेवण्यासाठी जागा हवी होती. ती सुदुंबरे येथील संस्थेने देऊ केली. त्या बांधकामास आवाहन करताच मा. प्रकाशशेठ केदारी यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ रू. १०,०००/: ची देणगी रोख दिली. इतर बांधवांनी रू. ४००० रोख जमा केले. कार्यकारी मंडळाने प्रत्येकी १००० रूपये व श्री. मेरुकर यांनी ५००० रू. तात्पुरती ठेव जमा केली. तसेच श्री. सदाशिव पवार व बंधूनी (चिंचवड) बांधकामासाठी लागणारे सामान दिले. चिखली येथील गरीब शेतकरी व सोहळ्यातील टाळकरी श्री. बेगाडी केशव कहाणे यांनी आपले सर्टिफिकेट बँकेत ठेवून परिस्थिती नसतानाही रू. ८५०० ची ठेव दिली. पंढरपूर येथे जागा खरेदीस श्री. बाळासाहेब शिंदे (पंढरपुर) श्री. नामदेवरव गवळी (वाखरी) यांचे सहकार्य मिळाले.
कोणतीही संस्था उभी राहताना भविष्याचा वेध घेंऊन उभी राहिली तर त्या संस्थेकडून चांगल्या कार्याची अपेक्षा करावी. ती भक्कम होण्यासाठी कार्यकारी मंडळाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. संस्थेस मिळणारी देणगी इन्कमटॅक्स माफ करून घेतली. या कामात श्री. व सौ. सदाशिव पवार (चिंचवड) यांचा सिंहाचा वाटा होता. श्रीमती प्रमिलाताई धोत्रे यांनी हा सर्व भव्य सोहळा जेव्हा प्रथम पाहिला तेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण झाली. या समाजकार्यात मदत करणे म्हणजे विउलांचे जिवंत स्मारक होय असे वाटले. त्या पंढरपुरी गेल्या. पहिल्या वारीपासून आजपर्यंत तुळसीवाली, पाणी देणारी बाई यांना साडीचोळी त्या करतात. विणेवाल्याला पोषाख देतात. पंढरपूर येथे तनपुरे महाराजांच्या विनंतीस मान देऊन त्या मठास एका खोलीची रक्कम दिली. त्या मठात पालखी सोहळ्यातील २५० ते ३०० वारकर्यांना जेवण देतात. तसेच सोहळ्यास तेवढेच रूपये जेवणाला देतात. वाल्हे येथे वारकर्यांची आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी ४२० रू. दिले पालखी सोहळ्याची मंडळी जेव्हा जेव्हा येत तेव्हा तेव्हा त्यांना आर्थिक व इतर मदत ही केली.
पण लक्षात राहते श्रीमती धोत्रे यांचे भविष्याचे वेध घेणारे कार्य. सोहळ्यास लोटणार्या जनलसमुदायाचे जेवण बनविण्यास भांडीच नव्हती. ती जवळ जवळ सुरूवातीस देण्याचे काम यांनी केले. याचबरोबर पालखी सोहळ्याचा इतिहास हा असाच संपेल. हे महान कार्य करणारी जी जी माणसे होती. ती ती माणसे अंधारात राहू नयेत अशी इच्छा हा सोहळा सुरू झाल्यापासून होती. तो इतिहास जपला जावा यासाठी ४ ते ५ हजार खर्च करून हा इतिहास छापील केला. यामध्ये त्यांच्या भगिनी सौ रूक्मिणीबाई दयाराम भोज यासुद्धा असत तसेच चंपाबाई हिवरेकरही असत. या भगिनींनीही मदत केली. तसेच मेहुणे आत्माराम भोज यांनीही मदत केली.
सोहळ्यास गरज असताना अनेकांनी मदतीचा हात दिला. श्री. पन्हाळे बंधू पालखी, श्री. वसंतराव व्हावळ यांनी पालखीचे सोहरण व पखवाजाच्या गुड्या दिल्या. श्री. अंबिके लक्ष्मण तुकाराम (पुणे) यांनी पालखीचे छत, एक पखवाज पेटी दिली. भाडी दिली. माधवराव अंबिके तंबू, मारूती पाटाजी शेलार तंबू, नारायण गाव समाजबांधव तंबू, घोडेगाव समाजबांधव तंबू, साकूर मांडवे, समाजबांधव तंबु खेड (राजगुरूनगर) समाजबांधव तंबू, माधवराव धोत्रे कर्हाड तंबू, दळवी साहेब अवसर तंबु बंधू, चासकमान समाजबांधव तंबू, कडूस समाजबांधव तंबू, इतर समाज बांधवांनी मदत केली.
सर्व समाज बांधवांचे सहकार्य घेऊन हा सोहळा भरीव करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
