जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या ! - खान्देश तेली समाज मंडळ
खान्देश तेली समाज मंडळाचे निदर्शने
ओझर (ता. जामनेर) येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी आज खान्देश तेली समाज मंडळातर्फे निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मागील पंधरवाड्यात जामनेर तालुक्यात मुसळधार पाउस झाला. यामध्ये ओझर व मोयखेडा (ता.जामनेर जि.जळगाव) येथे अतिवृष्टी झाल्याने या गावामध्ये शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांचे पत्रे उडाल्याने शेतकरी बेघर झाले आहेत. कपाशी, केळीच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. शासनस्तरावर पंचनामे होवून अद्याप कोणतीही मदत संबंधीत शेतक-यांना मिळालेली नाही. तरी ओझर व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मंडळाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादीही निवेदनासोबत जोडली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव रविंद्र चौधरी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
