तेली समाज महासंघातर्फे चंद्रपूर - अल्लीपुर - पंढरपूर पायदळ पालखीचे उत्साहात प्रस्थान
तेली समाज महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चंद्रपूर-अल्लीपुर-पंढरपूर या पवित्र मार्गावरील पायदळ पालखीचे शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भक्तीमय वातावरण निर्माण केले.
या पायदळ वारीचे नेतृत्व समाजसेवक राजेश बेले यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून, वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
पालखी प्रस्थानापूर्वी श्री संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोरजी जोरगेवार यांनी संतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच पालखीतील सहभागी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी नागपूर येथील श्री संत संताजी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत खोबरागडे (देशमुख), डॉ. गोपाल वाघमारे तसेच माधुरी वाघमारे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. डॉ. यशवंत खोबरागडे यांनी नागपूरच्या वतीने आमदार किशोरजी जोरगेवार आणि वारीचे प्रमुख राजेश बेले यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. या सन्मान सोहळ्यामुळे कार्यक्रमाचे औचित्य अधिकच वाढले.
कार्यक्रमाला विदर्भ तेली महासंघाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय बबनराव फंड यांचे जेष्ठ चिरंजीव विक्रम फंड, प्रा. रमेश पिसे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री संत संताजी महाराजांचे भक्त आणि तेली समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भक्ती, समाजएकता आणि संतपरंपरेचा वारसा जपत निघालेली ही पायदळ पालखी समाजामध्ये आध्यात्मिक प्रेरणा निर्माण करणारी ठरत असून, पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या या वारीला सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
