श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेचा उपक्रम; समाजाच्या साथीने साकारला भव्य दिव्य वृक्षारोपण सोहळा !
बनवडी हायस्कूलमध्ये विद्यार्थी, ग्रामस्थ आणि संस्था एकत्र आले, प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक
कोरेगाव तालुक्यातील बनवडी हायस्कूल, जिल्हा सातारा येथे आज दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी बारा वाजल्यापासून वृक्षरोपणाचा एक अति भव्य आणि संस्मरणीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एखाद्या कार्यक्रमाला समाजाचा भक्कम पाठिंबा आणि व्यापक सहभाग लाभला, तर तो कार्यक्रम किती उत्कृष्ट आणि यशस्वी पद्धतीने पूर्ण होऊ शकतो, याचे हे एक जिवंत आणि बोलके उदाहरण ठरले. सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आज असंख्य वृक्षप्रेमी नागरिक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वृक्षरोपणाच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात सहभागी झालेच, त्याचबरोबर बनवडी गावचे मान्यवर स्कूल कमिटी अध्यक्ष, आदरणीय मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी आणि शाळेतील समस्त विद्यार्थीही या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष मा. राम पडगे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती देत, वृक्षरोपणाचे महत्त्व अत्यंत सोप्या आणि समजेल अशा शब्दांत उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आजच्या काळात विद्यार्थी मित्रांना वृक्षरोपणाचे खरे महत्त्व समजणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आपण निसर्गाकडून विनामूल्य ऑक्सिजन घेऊन आपले जीवन जगत असतो, मात्र या निसर्गाचे उपकार फेडताना, शासनाचा आदेश असल्याशिवाय आपल्याला त्याचे महत्त्व सहसा जाणवत नाही. हेच महत्त्व सर्वसामान्य नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी आमची संस्था दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करून सर्वांना यात सहभागी करून घेत असते आणि या राष्ट्रीय कार्यात सातत्याने योगदान देत असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो, असे राम पडगे यांनी नमूद केले. आजचे हे वृक्षरोपण शाळेच्या तारेच्या कंपाऊंडच्या आतच करण्यात आल्याने ही सर्व झाडे निश्चितपणे सुरक्षित राहतील आणि त्यांची देखभालही योग्य प्रकारे केली जाईल. त्यामुळे आजचे वृक्षरोपण अत्यंत योग्य आणि सुरक्षित ठिकाणी झाले आहे, असे आपले स्पष्ट मत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण निसर्गाचे काही तरी देणे लागतो, या निमित्ताने आपण निसर्गाच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी बोलताना शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्थेचे मी मनःपूर्वक आभार मानतो. अशा प्रकारे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था आपल्या परिसरात कार्यरत आहे, याचा आम्हा सर्वांना आणि संपूर्ण समाजाला निश्चितच सार्थ अभिमान आहे. आज मी या निमित्ताने अभिमानाने सांगू इच्छितो की, आज लावलेल्या या झाडांपैकी प्रत्येक झाड एका विद्यार्थ्याला दत्तक म्हणून देण्यात येत असून, प्रत्येक विद्यार्थ्याने त्या झाडाचे मायेने संगोपन करायचे आहे, अशी जबाबदारी त्यांनी विद्यार्थ्यांवर सोपवली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. ननावरे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे मनापासून आभार मानले. ग्रामीण भागातील अशा डोंगराळ परिसरात आपण सर्वजण एकत्र येऊन, सर्वांच्या जीवनाशी थेट निगडित असलेला हा सामाजिक उपक्रम राबवत आहात, जो आज राज्य स्तरावर प्रोत्साहन मिळवत असून एक राष्ट्रीय उपक्रम म्हणून राबवला जात आहे, यासाठी मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो, असे ते म्हणाले. आपल्या संस्थेची माहिती मला मिळाली असून, संस्था जे कार्य करत आहे आणि ज्या पद्धतीने ते करत आहे, त्यासाठी कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे, अशा शब्दांत त्यांनी संस्थेचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वीच भोंदवडे येथील मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून संस्थेने फार मोठे सामाजिक कार्य केल्याचे आपल्या वाचनात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. आज विद्यार्थी, गावकरी तसेच संघटनेचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांना एकत्रितपणे सहभागी करून घेत हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवत आहात, यासाठी मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशा संस्था समाजात अधिकाधिक निर्माण व्हाव्यात, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
आजच्या या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी अध्यक्ष मा. बाळासाहेब नलगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. ननवरे सर, मुख्याध्यापक मा. अविनाश साळुंखे सर, तसेच त्यांचे सहकारी कारंडे सर, शिंदे सर, कदम सर आणि शेख सर विशेष उपस्थित होते. याशिवाय आजचा कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यामध्ये ज्यांनी मोलाचा सहभाग आणि सहकार्य दिले, ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. जाधव सर हेदेखील आवर्जून उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. विठ्ठलराव शिरसागर, नामदेवराव झगडे, पोपटराव भोज, प्रदीप देशमाने, शिवदास किरवे, अनिल किरवे (सातारा), युवराज खेडकर, प्रवीण रोकडे, राजेंद्र किरवे, अनिल किरवे, बबन किरवे, अरुण किरवे, विजय किरवे, विजय चव्हाण, विलास किरवे, प्रवीण किरवे, सतीश दळवी, शुभम लोखंडे, रामचंद्र दळवी, शिवाजीराव गंधाले, संतोष भिसे यांच्यासह सौ. राजश्री रोकडे, आशा किरवे, सौ. संध्या किरवे, सौ. रत्ना दळवी आणि सौ. लता पडगे या महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- राम पडगे, अध्यक्ष, श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा, महाराष्ट्र
