Sant Santaji Maharaj Jagnade
प्रामुख्याने तेली समाज मोठय़ा प्रमाणात पूर्व नागपुरात आहे. पण बदलत्या काळात अनेक तेली बांधव पश्चिम नागपुरात स्थायिक झाले. विखुरले गेल्यामुळे त्यांचा समाजाशी असणारा संबंध-संपर्क कमी झाला. समाज एकसंघ राहावा, या हेतूने ही संघटना शंकरराव भुते यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली.
नागपुर सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. विवाहात प्रचंड खर्च होतो, त्यामुळे पालक हवालदिल होतात. अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांची आयुष्यभराची पुंजी मुलांच्या विवाहात संपून जाते. यावर तोडगा काढण्यासाठी संताजींच्या विचारांनी प्रेरित होऊन सामूहिक विवाहाची संकल्पना जवाहर विद्यार्थी गृहाच्या साह्याने तयार करण्यात आली.
तेली समाज महासंघ म्हणजे एक चळवळ आहे. तेली समाजाच्या सर्व नागरिकांची ही एक शीर्षस्थ संस्था आहे. शिक्षणाचे प्रश्न, नागरीकरणाचे प्रश्न आणि तेली समाजाला भेडसावणारे अनेक प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून शासनापर्यंंत पोहोचविणे आणि न्याय मिळविण्यासाठी धडपडणे हे महासंघाचे कार्य आहे. तेली समाजातील लोकांना एकत्र करण्यासाठी आणि समाजाची बांधणी करण्यासाठी हे कार्य सुरू आहे.
नागपुर तेली समाज सभेच्यावतीने समाजातील महिला व विद्यार्थ्यांंसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांंना शैक्षणिक मदत करण्याचा मानस आहे. मिरची बाजार, इतवारी येथून हे कार्य करण्यात येत आहे.
समाजातर्फे (अंबाळा) रामटेक आणि गरोबा मैदान, नागपूर येथे धर्मशाळा उभारण्यात आली आहे. व्यवसाय हा उद्देश यामागे नसून समाजातील गरीब नागरिकांना कमी दरात राहण्याची व्यवस्था करून देण्याचा मानस यात आहे. याचे अध्यक्ष हिरामण बावनकुळे, उपाध्यक्ष बळवंतराव ढोबळे आणि सचिव खुशालराव पाहुणे या धर्मशाळांचे व्यवस्थापन पाहत आहेत.